Showing posts with label taryanche bet. Show all posts
Showing posts with label taryanche bet. Show all posts

Thursday, April 7, 2011

ताऱ्यांचे बेट



एकता कपूरचा पहिला मराठी चित्रपट.

मानाचे दोन पुरस्कार प्रदर्शनापूर्वीच पटकावलेला आणि मध्यमवर्गीय कुटुंबाची जगण्यातली गंमत अधोरेखित करणारा ‘ताऱ्यांचे बेट’ हा चित्रपट १५ एप्रिल रोजी मुंबई, ठाणे, रायगडसह पुण्यात प्रदर्शित होतोय. किरण यज्ञोपवीत दिग्दर्शित ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर यांच्या ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ च्या ‘ऑल्ट एन्टरटेन्मेंट’ आणि नीरज पांडे, शीतल भाटिया यांच्या ‘फ्रायडे फिल्म वर्क्‍स’ या निर्मिती संस्थांनी संयुक्तपणे केली आहे. ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटाची कथा साधी पण नर्म विनोदी आहे. नाटक आणि चित्रपट या माध्यमांची उत्तम जाण असलेले किरण यज्ञोपवीत, सौरभ भावे आणि शैलेश दुपारे यांचे लेखन असलेल्या ‘ताऱ्यांचे बेट’ मध्ये सचिन खेडेकर, अश्विनी गिरी, किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, जयवंत वाडकर, शशांक शेंडे तसेच बाल कलाकार इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर आदी कलावंतांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘ताऱ्यांचे बेट’ मध्ये श्रीधर सुर्वे या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या ग्रामसेवकाच्या जीवनप्रवासाची अत्यंत खुमासदार कथा आहे. श्रीधर सुर्वे, त्याची पत्नी इंदू, आई, मुलगी मीरा आणि मुलगा ओंकार असे हे पाचजणांचे छोटेखानी कुटुंब मुंबईपासून दूर असलेल्या कोकणातल्या अतिशय निसर्गरम्य खेडय़ात सुखासमाधानाने राहात असते. मध्यमवर्गातले कुटुंब, त्यांची बेतासबात अशी असलेली आर्थिक परिस्थिती, एकीकडे तुटपुंजे वेतन आणि दुसरीकडे वाढत्या महागाईला तोंड देण्याची तारेवरची कसरत त्याला करावी लागते. असे असूनही आहे त्यात सुखासमाधानाने हे कुटुंब जगत असते.

श्रीधरला शासकीय कामानिमित्त मुंबईला ये-जा करावी लागत असते. एकदा तो त्याच्या बायको-मुलांना मुंबईत फिरायला नेतो. आणि एका गमतीशीर गोष्टीला येथूनच सुरुवात होते. पूर्वी कधीही शहर न पाहिलेल्या बालवयीन ओंकारला मुंबईचे वैभव पाहून कुतूहल वाटते. आपल्याला पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जावे, असा हट्ट तो वडिलांकडे करतो. ओंकारचा हट्ट पुरवणे श्रीधरसाठी तर अशक्यच असते. नंतर पुढे ओंकारला श्रीधर असे सांगतो की तू परीक्षेत पहिला आलास तर तुला पंचतारांकित हॉटेलमध्ये नक्की घेऊन जाईन, पण हे आव्हान ओंकार स्वीकारून झपाटल्यागत अभ्यासाला लागला आहे, असे पाहून श्रीधरला घाम फुटतो. मध्यमवर्गीय परिस्थिती स्वीकारून पुढे सरकणारा एका कुटुंबाचा प्रापंचिक प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. स्वत:बरोबरच आपल्या मुलाबाळांनी पाहिलेली स्वप्नं, शहरी झगमगाटाबद्दल मुलाबाळांना वाटणारे आकर्षण, त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्या धडपडीतून पुढे येणारे विविध संदर्भ, यांचे खुसखुशीत आणि हलकेफुलके चित्रण या चित्रपटात दिसेल.

‘ताऱ्यांचे बेट’ ची कथा माणसाला नकळत बरेच काही सांगून जाते. वेगाने वाढत चाललेल्या चंगळवादाचे भीषण रूप काय असेल, याचे दर्शन तर यात होईलच पण त्याचबरोबर भावनिक नातेसंबंधांनी घट्ट बांधलेली अनेक वर्षांची असलेली आपली कुटुंबव्यवस्था या चंगळवादामुळे पूर्णत: ढासळण्याच्या मार्गावर आहे. याचा इशाराही यात मिळेल. याचबरोबर आपण वेळीच सावरलो नाही तर समाजव्यवस्थेमध्ये अराजकता निर्माण झाल्यासारखी परिस्थिती दिसायला लागल्याशिवाय राहणार नाही, असेही नकळतपणे सूचित होत असल्याचे लक्षात येईल. मराठीसाठी नवीन चित्रपटनिर्मिती संस्था, नवा दिग्दर्शक, अनुभवी कलाकार तंत्रज्ञांची टीम, नवा विचार, नवीन कल्पना असलेल्या ‘ताऱ्यांचे बेट’ या चित्रपटाने पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पटकथा लेखन आणि अभिनयासाठी असे दोन पुरस्कार मिळवले आहेत.  

आजच्या काळात जे चित्र दिसतंय त्या जागतिकीकरणाच्या रेट्यात शहरी जीवनच काय पण ग्रामीण जीवनही अगतिक होतंय. कोकणातल्या दुर्गम भागात असलेल्या अशाच एका अगतिक कुटुंबाची ही गोष्ट आहे. `ताऱ्यांचे बेट'चे चित्रीकरण, कोकणातल्या दापोली, आंजर्ले, केळशी तसेत मुंबईतील गेटवे, भाऊचा धक्का, नरिमन पॉइंट, हाजीअली, वरळी, पवई आदी परिसरात झाले असून एक तास पंचेचाळीक मिनीट कालावधीचा हा चित्रपट आहे. हा किरण यज्ञोपवीत यांच्यासाठी दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न म्हणून हा चित्रपट महत्त्वाचा होता. यात सचिन खेडेकर, अश्विनी गिरी सोबत किशोर कदम, विनय आपटे, शुभांगी जोशी, जयवंत वाडकर, शशांक शेंडे तसेच बाल कलाकार इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर आदी कलावंत या चित्रपटात आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सची सहयोगी संस्था असलेल्या एकतू कपूरच्या ऑल्ट एन्टरटेन्मेंटने आणि नीरज पांडे, शीतल भाटिया यांच्या फ्रायडे फिल्म वर्क्स यांनी संयुक्तपणे `ताऱयांचे बेट' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...